शनिवार, २ जून, २०१२

प्रश्न

हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात  प्रश्न पडणंही कमीच झालंय पण तरीही मला कधी कधी प्रश्न पडतात .....

शिवाजी महाराज किंवा भगतसिंग, सुखदेव, राजगुरू किंवा लाल बाल पाल त्रयी यांना त्यांची आई बोर्नविटा किंवा होर्लीक्स किंवा बुस्ट हेच प्यायला द्यायची का ?
कारण त्याशिवाय ते मोठे कसे होतील ? 

पूर्वीच्या बाया आणि बाप्ये केसांना काय लावायच्या? म्हणजे त्यांचे केस लांब आणि काळेभोर कसे व्हायचे ? 

इंग्रजांच्या डोकेदुखीला कंटाळून सर्वच जण डोकेदुखीच्या गोळ्या घेत असतील, नाही ?

आणि इतिहासात कुणीच कसं जाड नव्हतं ? अगदी अफजलखानही धिप्पाड होता पण जाड नसावा....
काय खायचे अन कुठल्या जिममध्ये  जायचे ते ?

    

आणि आपलं तोंड किती घाण आहे हे आपल्या पूर्वजांना माहीतच नसेल. (जाहिरातीत नाही का कुठे कुठे लपलेले किटाणू दाखवतात.. टॉयलेट क्लीनर आणि टूथ पेस्ट च्या जाहिरातींतल्या साम्यावरूनच हे ओळखून घ्यावं .) नाहीतर त्यांनी माकडछाप काळं दंतमंजन कशाला वापरलं असतं ? (पलीकडच्या आजोबांचे दात अजूनही चांगले कसे राहिले कोण जाणे...कोणती टूथ पेस्ट वापरायचे ते लहानपणी ? अजून ऊस सोलून खातात)


   माणूस उत्क्रांत खराच... नाहीतर लांडोरीला आकर्षित करण्यासाठी मोराला किंवा मैनेला आकर्षित करण्यासाठी मिस्टर कोकीळला deodorant सारखा सोप्पा पर्याय का नाही सुचला ?

आणि मी शास्त्र उगाच शिकलो. त्यात साबण म्हणजे काय, तो कसे कार्य करतो ते सांगितलंय. साबण म्हणे पृष्ठीय तणाव कमी करून तेलकट पदार्थ पाण्यात विरघळायला मदत करतो आणि अशा प्रकारे हातावरची घाण अन किटाणू धुवून जातात. मरत नाहीत. (मेले तर ते मुख्यतः साबणाच्या pH अर्थात सामू मुळे) . पण जाहिरातीत मात्र काय काय सांगतात...तेच खरं असावं नाही का ? म्हणजे अमुक एक साबणच किटाणूंना मारून टाकू शकतो. आणि अमुक एक साबणच तुम्हाला सुंदर बनवू शकतो (हे तर शास्त्रात शिकवलंच नव्हतं ) शिक्षण बोर्डाने सर्व जाहिरातीतील माहितीची आणि त्यांच्या शोधांची दाखल घेवून अभ्यासक्रम बदलायला हवा.

अरे हो, आणि भाजीवाले काका, फुगेवाले काका यांच्यापासून किटाणूंचा फैलाव होतो हेही शिकवायलाच हवं.



उष्ण आणि कोरड्या प्रदेशातील घरांची छपरं धाब्याची असतात, तर खूप पाऊस असणाऱ्या भागातील घरं ही उतरत्या छपरांची अन कौलारू असतात.
शेकडो वर्षांचा अनुभव गाठीला घेऊन माणसाने ही रचना केली न ? मग आता हे सारं कालबाह्य आणि भूगोलाच्या पुस्तकापर्यांतच मर्यादित होऊन बसलंय, असं का ?

तंत्रज्ञान प्रगत झालं हे खरं पण त्याने फक्त पक्की घरं बांधण्याबरोबरच तिथल्या वातावरणाला साजेशी घरं का बांधली जात नाहीत ? उन्हाळ्यात concrete तापतं, मग AC बसवा... धाब्याच्या घरांत कसं थंड असायचं...
तंत्रज्ञानाचा अविचारी वापर आपल्याला कुठे घेऊन जाईल ? 

आणि आजकाल मंत्रीमंडळाच्या शपथविधीत किंवा त्यानंतर आणखी एक शपथविधी का नको? म्हणजे घोटाळे करणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी बाजाविनच असा ....

आणि दंगे, बंद, कुठल्याही क्षुल्लक कारणावरून चालणारा गदारोळ यात भारताची जी उर्जा वाया जातेय, त्यात एखादा अणुउर्जा प्रकल्पाच्या तोडीचा प्रकल्प चालेल काय ?

आणखी बरेच प्रश्न... म्हणजे बिन झाडांची पृथ्वी किती छान दिसेल ?.... आपण सर्व झाडे संपवून टाकू... जंगलेही संपवू. (कोळशाच्या अन कशाकशाच्या खाणी जंगलातच राहिल्यात ना आता.... त्याशिवाय नासायला, जाहिरात फलक झळकवायला वीज कशी मिळणार?)
शेतजमिनीही NA करून बंगले बंधू... शेतांचं काय... आत्महत्या करणारे शेतकरी करतीलच काहीतरी.

२५० फुट, ४०० फुट, ८५० फुट, ११०० फुट.....आणखी किती खोल जात राहणार आणि आणखी किती छिद्रे पाडणार या पृथ्वीला ? आणि जे पाणी भूगर्भात आहे ते कधी संप(व)णार? मी बोर-वेल बद्दल बोलतोय. ११०० फुट ही आमच्या बिल्डींग मधील आजची परिस्थिती आहे, जी तिसरी अशी बोर-वेल आहे. आजूबाजूला रोज एक बोर घेणं चाललंय.....
पावसाचं पाणी स्वतः पुढाकार घेऊन नाही साठवता येणार का? कि त्यासाठीही शासनाने नियमच करायला हवाय ? 

हल्ली रस्त्यांवर पाहतो....कारमध्ये फक्त एकच जण बसलेला...बाकी ३-४ सीट रिकाम्याच....म्हणजे आपली एफिशियन्सी १/५ आहे नाही? आणि अशा कारमुळे जी जागा रस्त्यांवर अडते, त्यामुळे वाया जाणाऱ्या  कार्यक्षमतेचं काय ?
मला कारण माहित आहे. कंपन्या याला प्रोत्साहन देतात. त्यांच्या म्यानेजर्सना टिकवून ठेवण्यासाठीच्या योजनांपैकी ही एक. वाढलेल्या पेट्रोलच्या किमतीचं त्यांना काय ? मग या १/५ एफिशियन्सीचा बोजा कुणावर टाकायचा ? हाही एक प्रश्नच...

आणि याच तथाकथित सुशिक्षित आणि सुसंस्कृत लोकांच्या कार मधून कचरा रस्त्यांवर फेकला जातो तेंव्हा त्यांच्या सुसंस्कृत आणि सुशिक्षितपणाचं पारितोषिक कुणाला द्यायचं ?

डार्विन एक थेअरी लिहायला विसरला वाटतं... म्हणजे सर्व्हायवल ऑफ फिटेस्ट असं तो म्हणाला. म्हणजे माणूस... पण माजोर्ड्यांचा विनाश हे लिहायला विसरला तो.  म्हणजे डायनोसोरचा झाला तसाच....


  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Rishibhai मित्रांनी दिलेलं नाव.