बुधवार, २४ डिसेंबर, २०१४

नातं

आताशा आभाळाशी नातं राहीलं नाही. तारांगण परकं झालंय. गॅलरीतून पलिकडच्या बिल्डींगमधल्या अनोळखी चेहऱ्यांकडे, व्यक्तींकडे पहावं तसं या ताऱ्यांकडे पाहणं होतं. कधीतरीच....
तसं मातीशी तरी कुठं राहीलंय नातं? तीही तर परकीच झालीय ना. कुठे तरी तिसऱ्या मजल्यावर अधांतरी जगायचं....खाली मातीवर सहा इंचांचा काँक्रीटचा नाहीतर डांबरी थर.

नावं, ओळखीच्या खुणा, लकबी, लांब राहून कालांतराने अपरिचीत व्हायला लागतात तसं. आणि मग चेहरेही अपरिचीत होतात.  

कुठं ते तासन् तास छतावर कुडकुडत तारे पाहत जागणं, नावांनिशी नक्षत्रं, तारे हुडकणं, चिखलांतून गज खुपसा-खुपशी खेळत अंतराचं भान विसरून हुंदडणं...

केंव्हा भरले होते शेवटचे मातीने हात? केंव्हा पाहिले होते शेवटचे डोळेभरून तारे आणि केंव्हा शेवटची जाणीव झाली होती माणसाच्या क्षुल्लकपणाची या अफाट विश्वात?

Rishibhai मित्रांनी दिलेलं नाव.