रविवार, २९ जानेवारी, २०१२

काळ

 संग्रहालयातील एक मोठा हॉल. तुडुंब भरलेला. सगळ्यांच्या नजरा एका मोठ्या लाकडी घड्याळावर खिळलेल्या. घड्याळावर सुंदर नक्षी. 
जुनाट वस्तूंवर एक  गुढतेची छटा येत जाते आणि तसतसं त्यांचं मूल्यही वाढत जातं. त्या मौल्यवान होत जातात. लहानपणी तर अशा जुनाट, गूढतेचं अभ्र पांघरलेल्या वस्तू परीराज्यातून आल्यात असं वाटायचं. त्यांच्यामागे अल्लाउद्दीनच्या दिव्यासारखी काही जादू लपली असेलसं वाटायचं. त्यामुळे अशा वस्तूंचं (मग ते काहीही असो) मूल्य आमच्यालेखी अनमोलच असे. 
तसंच दिसणारं हे घड्याळ...

सेकंदही बराच मोठा वाटतोय. काळ मंद झालाय, एक एक पाऊल तो चालतोय. त्याच्या एका पावलामागे 
ऱ्हदयाचे अनेक ठोके पडलेले..... क्षणात वाटून जातं,  इथं काळ एवढा मंद, हळू कसा? आयुष्याची तीस वर्षं कशी क्षणात निघून गेली आणि इथं एक एक मिनिट जाता जात नाही. वाट पहावी लागतेय. 

मृत्युशय्येवर वृद्धापकाळीही असंच असेल. काळाचं जवळ येणारं पाऊल असंच संथ पडत असेल. 


पंधरा मिनिटे राहिली. मंजूळ किणकिण ऐकू येते.

आता एक अस्वस्थ शांतता पसरलीय. लोकांच्या अस्वस्थ नजरा. घड्याळातील नगारा वाजवणारा माणूस. सेकंदाच्या लयीत त्याचा हात नगाऱ्यावर पडतोय. 

बरोबर तीन मिनिटे राहिली. दार उघडलं घड्याळातलं अन तिथं एक माणूस अवतरला. शंभर दोनशे लोकांची अस्पष्ट पण एका लयीत असल्यासारखी कुजबुज, आणि मग पुन्हा सगळं शांत. नगाऱ्यावरचा हात, क्षण, सेकंद, काळ सगळं शांत, मंद हळू .... अधीरता, उत्सुकता ताणली गेलेली.

बारा वाजतात. मघाचा दारात आलेला माणूस घंटेवर ठोके द्यायला लागतो. एक, दोन, तीन....
आता प्रेक्षाकांमधूनही अस्फुट शब्दोच्चार ...त्या ठेक्यांच्या लयीत. चार पाच सहा...

जणू काळ ठोके देतोय....काळाचेच तर ठोके न हे ? त्यांची लय ऱ्हदयातल्या ठोक्यांशी जोडल्यासारखी वाटतेय. 

सात, आठ, नऊ, दहा, अकरा, बारा...पाहता पाहता ठोके देणारा माणूस अदृश्य होऊन जातो. संपलं सगळं. काळही असंच झडप घालत असतो न ? काळाबरोबर आपण आयुष्य मोजत राहावं, बारा वाजतात आणि 
ऱ्हदयात ठोके देणारा गायब. ठोके शांत सगळं शांत.

अचानक आनंदाचे, हर्षाचे चित्कार आणि टाळ्या उमटतात. शंभर दोनशे लोकांनी एकदम व्यक्त केलेला आनंद. 
हा आनंद नवा तास, नवा डाव सुरु झाल्याचा ? पुन्हा एक पासून गणना सुरु होणार म्हणून ? 

मी भानावर येतो. समोर सुंदर नक्षीकाम केलेलं लाकडी गूढ घड्याळ आणि आजूबाजूला पांगत चाललेली गर्दी.....                                                  

रविवार, १ जानेवारी, २०१२

भोंगीर (भुवनगिरी)

काल मला हैदराबादेत जीवन असल्याची जाणीव झाली... इतके दिवस घुसमटत जगत होतो इथे....काल जरा मोकळा श्वास घ्यायला मिळाला... निमीत्त झालं भोंगीरच्या (भुवनगिरी) चढाईचं!
माझी इथे आल्यापासून कायम तक्रार होती... इथे आजुबाजूला काहीच नाहीय....फिरायला, ट्रेकींगला....कमीत कमी १८० कि.मी. जावं तेंव्हा कुठे नागार्जुनसागर सारखं एखादं ठिकाण सापडतं... पण आता मी अशी तक्रार नाही करणार.
काही दिवसांपूर्वी आलेर (कुलपाकजी) या जैन तीर्थक्षेत्री जाताना ट्रेनमधून  एका प्रचंड मोठ्या  एकसंध पाषाण कड्यावर एक किल्ला दिसला. गाडी या किल्ल्याला अर्धवर्तुळाकार वळसा मारून जाते. ठरवलं, या किल्ल्यावर यायचं.
काल योग आला. किल्ला दुर्गम नाही. पण तहानच ती. दुध नाही मिळालं तर ताकावर भागते..

View Larger Map

घरातून सकाळी सात वाजता निघालो. सिकंदराबाद, उप्पल मार्गे भुवनगिरी असा सरळ रस्ता आहे. उप्पल पासून वारंगळ हायवे ने साधारणतः ४० कि. मी. गेल्यावर समोेर हा एकसंध शिलाखंड असणारा डोंगर अन् त्यावर ठेवल्यासारखी दिसणारी भग्न इमारत दिसू लागते. इथेच डाव्या हाताला भुवनगिरीचा फाटा फुटतो. रस्ता चांगला आहे. गावात गेल्यानंतर बस स्टँडच्या मागच्या बाजूचा रस्ता किल्ल्याच्या अगदी पायथ्याशी नेवून सोडतो. पायथ्याशी एक देवीचं आणि मारुतीचं देऊळ आहे. वर जाणारा रस्ता थोडा अलिकडेच आहे. त्याला कमान आहे अन् तिथून पायऱ्या सुरू होतात. तटबंदी बऱ्याच ठिकाणी शाबूत आहे. झाड झाडोरा वाढलाय. अर्ध्या रस्त्यात गेल्यावर त्या मोठ्या शीलाखंडाचा दुसरा टप्पा दिसू लागतो. या दोन टप्प्यांच्या मधल्या खोबणींना बंधारा घालून तिन टप्प्यांमध्ये पाणी साठवायची व्यवस्था केलेली दिसते. (आता त्या कुंडांत कमळं उगवलीत) इथून पुढे दगडातच पायऱ्या कोरल्यात.
अगदी वर गेल्यावर घोंघावणारे वारे सुरू होतात... वरही कुठेकुठे बांध घालून पाणी साठवायची व्यवस्था केलीय.

वर जावं, हैदराबादच्या कलकलाटापासून, जीवघेण्या ट्राफीकपासून, शहरी आणि कृत्रीम जीवनापासून दूर, शांत-निवांत बसावं, मोकळी हवा खावी, खाली खेळण्यातल्या सारख्या दिसणाऱ्या झुकझुकगाड्या पहाव्यात, शांत पडून रहावं, फुप्फुसांमध्ये जीवन भरून घ्यावं दोन चार सुंदर घटका अनुभवून खाली यावं
एक दिवसात जावून येण्यासाठी छान ठिकाण आहे. मोटारसायकलने जायलाही मजा येइल. गाडीने जायची इच्छा नसेल तर सिकंदराबादहून भुवनगिरीला सकाळी भरपूर ट्रेनही आहेत.

भुवनगिरी पासून १३ कि.मी. वर यादगिरीगुट्टा इथं श्री नृसिंहाचं देऊळ आहे. भुवनगिरी ते यादगिरीगुट्टा हा रस्ताही सुंदर आहे. दोन्ही बाजूंना व्हिडीओ गेममध्ये असतात तसे डोंगर, तलाव..... तलावांमध्ये चित्र-बलाक अन् तत्सम पक्षी.....

 या रस्त्यावर मला नीराही पहायला मिळाली! लोक ताजी नीरा झाडावरून काढून आणून त्याच माठांमधून विकत होते...

खाली काही छायाचित्रे देत आहे....

.







































 


Rishibhai मित्रांनी दिलेलं नाव.