बुधवार, १६ नोव्हेंबर, २०११

अहाहा किती सुंदर दृश्य आहे न हे? हा आहे नागार्जुनसागरचा सुंदर आणि विस्तीर्ण जलाशय.



अरे हे काय आहे?



कुरकु-यांचं पाकीट पाण्यावर तरंगतंय !!!!


तर आपल्याला कुठे काही सुंदर पाहिलं कि ते घाण केल्याशिवाय राहवत नाही. एक आई वडील प्लास्टिकची पाण्याची बाटली पाण्यात फेकून खिदळत होते. त्यांच्या मुलांवर तर चांगले संस्कार झाले न ?


एक गणित शालेय अभ्यासक्रमात असायला हवं
नागार्जुन सागर ला तीन बोटी प्रत्येकी पाच चकरा करतात. प्रत्येक बोटीवरून प्रत्येक फेरीला दहा बिस्कीटचे पुडे, पाच पाण्याच्या बाटल्या, चार पेप्सीचे कॅन, दहा कुरकुरे सदृश पाकिटे, पाच चॉकलेटचे कागद एवढा कचरा पाण्यात फेकला जातो, तर दिवसाला कोणत्या प्रकारचा किती कचरा पाण्यात फेकला जातो?

सरकार तर्फेच हा व्यवसाय चालतो. मग कोणाला बोलणार?


तरी एका धीट बाईंनी चार टग्या तरुणांना यावरून चांगलाच दम भरला. मी स्वतः जाऊन त्यांचे आभारही मानले आणि ठरवलंय कि शक्यतो हे आपल्या पर्यंत मर्यादित न ठेवता कुणीही कचरा करताना दिसला तर त्यालाही परावृत्त करायचा प्रयत्न करायचा.

त्यासाठी भांडायचीही गरज नाही. गांधीगिरी उत्तम. म्हणजे मी असंही सांगू शकतो कि जर तुम्हाला हा कचरा सांभाळता येत नसेल तर मला द्या, मी सांभाळीन आणि कचरापेटीत टाकीन.
जर शहाणा असेल तर समजून जाईल. निर्लज्ज असेल तर असू दे, मी कचरा वाहीन. शेवटी माझा देश स्वच्छ राहावा म्हणून मी एवढा तर नक्कीच करू शकतो.    

शुक्रवार, ४ नोव्हेंबर, २०११

झाड

दिवस उजाडला तसं ते झाड थरथरत होतं. अंग चोरून उभं होतं. आज त्याच्या शरीरात चैतन्यरस सळसळत नव्हता. वारा पडला होता की त्या झाडानेच आपली पानं लपवायचा प्रयत्न केला होता ? पाखरांशी बोलण्यातही त्याला आज रस नव्हता. 
यावेळी पाउस चांगला झाला होता.... केवढी हिरवाई चढली होती त्याच्या अंगावर.... पण आज तो हिरवा रंगही विटला होता. 
काय झालं होतं ?
त्याने हळूच डोळे उघडून पाहिलं....तो घोळका इकडेच येत होता... पूर्वी ते संध्याकाळी यायचे. आता सकाळीच येतात. पूर्वी त्यांना फार काही नको असायचं. हल्ली त्यांचं समाधानच होत नाही....
{आज दसरा. आजच्या दिवशी हजारो वर्षांपूर्वी त्याच्या पूर्वजांनी पांडवांच्या मदतीला धाव घेतली होती...कुबेराचं धन पांडवांपर्यंत पोहोचवलं होतं. त्याच्या पानाला सोन्याची किंमत आली होती तेंव्हा. अन तेंव्हापासून हा माणूस दसऱ्याला सोनं म्हणून त्याच्या पूर्वजांची, बांधवांची पानं लुटतोय. कालपरवा पर्यंत तो काही पानं घेऊन जायचा तिथपर्यंत ठीक होतं. म्हणजे ती एक अभिमानाचीच बाब होती त्याच्यासाठी. त्याच्या पूर्वजांबद्दलचा अभिमान!!! 
पण आता त्याच माणसांनी त्याच्या पानांचा बाजार मांडायला सुरुवात केली. त्यात त्यांची बरीच कमाई होते म्हणे. म्हणजे शहरात कुणी पांढरपेशा नोकरदार वर्ग आहे म्हणे ज्याने आपली अक्कल कुठे तरी गहाण टाकलीय आणि तो सर्व रूढी परंपरा त्या अकलेशिवाय अगदी व्यवस्थित पाळतो. तर हाच नोकरदार वर्ग या सोन्याच्या पानांसाठी नाणीही मोजतो.}
तो घोळका तिथे येऊन पोहोचला सुद्धा. आणि मग त्यांनी ओरबाडायला सुरुवात केली..... त्यांचं समाधान झालं. त्यांना हवी तेवढी (?) नाणी मिळणार असं वाटलं म्हणून किंवा ओरबाडायला काही शिल्लक राहिलं नव्हतं म्हणून तिथून ते चालते झाले. 
झाड तसंच अंग चोरून उभं होतं.... त्यांनी सोनं लुटलं नव्हतं. त्या झाडाची अब्रू लुटली होती... 


आताशा झाडांची अब्रू लुटल्याच्या बातम्या बऱ्याच यायला लागल्यात. म्हणजे कडू-लिंब आंबा यांच्या सौंदर्यावरही माणसांचा डोळा आहे हल्ली. आणि वड तर रस्त्याकडेलाच असतात. रस्ते रुंद करण्याच्या नावाखाली बरंच काही करता येतं. आणि वटपौर्णिमेचीही एक नवी प्रथा सुरु झालीय हल्ली. त्यात तर पार लक्तरंच काढली जातात....

या अब्रू लुटलेल्या झाडांनी कुणाकडे दाद मागायची आता? पूर्वी भुताने माणसाला झपाटल्यावर त्याला झाड म्हणायचे. आता माणसाने झाडाला झपाटल्यावर त्याला काय म्हणायचं?      

Rishibhai मित्रांनी दिलेलं नाव.