रविवार, १० जुलै, २०११

नवखा हैदराबादी

नावडतीचं मीठ अळणी म्हणतात तसंही असेल, पण हैदराबाद काही अजून आवडत नाही. आवडायचा प्रयत्न करूनही नाही...  

इथे 'आवडती' म्हणजे बंगळूर....
आपला साउथ इंडिया म्हणजे आंध्र, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू इतकाच (उत्तर भारतीय आपल्याला म्हणजे मराठी माणसांनासुधा साउथ इंडियन्स मधेच धरतात! ती गोष्ट वेगळी!!!)   पण हैदराबाद कुठल्याही दृष्टीकोनातून साउथ इंडियात आहे असं वाटत नाही.
दक्षिण भारताची खास निशाणी म्हणजे डोसा, इडली, वडा, उत्तप्पा आणि कॉफी... हे सगळं हैदराबाद मध्ये शोधावं लागतं आणि त्याची चव अशी की महाराष्ट्रातल्या एखाद्या हॉटेलातही या गोष्टी जास्त चांगल्या मिळतील. तसं नाही म्हणायला चटणी'ज म्हणून एक हॉटेल्स ची साखळी इथे आहे की जिथे या गोष्टी उत्तम मिळतात, पण आपण परदेशात येऊन खातो आहोत असं वाटावं. कारण ?  डोसा १२० रु. !!!
मग बंगळूर आठवतं. इडली, डोसा, वडा किंवा उत्तपा, या गोष्टी तिथे चविष्ट आणि १०-१५ रु. मिळतात!!! अगदीच चांगल्या हॉटेलात (A2B खूप प्रसिद्ध) गेलो तर ४० रु....
दक्षिण भारतात कुठल्याही हॉटेलात गेलो तरी केळीच्या पानावर जेवायला मिळेल, पण हैदराबादेत केळीचं पान जेवायला कुठेच मिळणार नाही.
दक्षिण भारताचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे फुलं. दक्षिण भारतीयांना फुलांचं भयंकर वेड. बंगळुरात एवढी फुलं की बस.... कॉलेज कुमारीही ब-याच वेळा गजरे लावतात. प्रत्येक बाजारात फुलांची दुकानंच दुकानं. दक्षिण भारतीय नटीला गजरा हा हवाच. पण हे इथे कुठेच नाही दिसत.
दक्षिण भारत खुपसा आपल्या कोकण सारखा. वातावरण, निसर्ग, लोक, संस्कृती, अशा ब-याचशा गोष्टींत. पण या सगळ्यात हैदराबाद अपवाद आहे. नारळाची झाडीही इथे नाही.    
हे म्हणजे कोकणात गेल्यावर वाडी आणि त्यातली आंबे, काजू, फणस, नारळ, पोफळी आणि केळी दिसू नये असं !!! 
लुंगी हा पोशाख अगदी संस्कृतीचा भाग आहे आणि एका काळानंतर आपणही  तो स्वीकारतो.
बंगळुरात राहणं म्हणजे एखाद्या सुटीत सहलीच्या ठिकाणी राहण्यासारखंच आहे. अगदी सकाळी जाऊन संध्याकाळी परतण्यासारखी ठिकाणं भरपूर. शनिवार रविवार आला की पाठीवर सॅक टाकून निघाले भटकायला. मग ती ट्रेकिंग असो, जुन्या उत्तम शिल्पकृती असलेल्या देवळांची ठिकाणं असोत, जंगलं असोत किंवा सुंदर निसर्गरम्य ठिकाणं असोत. बंगळूर आपल्याला आपलंसं करून टाकतं. लोकांमध्ये एक अदब आहे. एक संस्कृती वावरते. कोकणच्या माणसांसारखीच ही माणसंही साधी भोळी.
हैदराबादेत एक हैदराबादी आडमुठेपणा आहे. अगदी हैदराबादी भाषेपासून ते लोकांच्या वागण्यापर्यंत..... एका दुचाकीस्वाराला तो वाहतुकीच्या नियमाप्रमाणे चालल्यामुळे दुस-याने झापलेला पाहिलंय. बंगळुरुला असताना तिथल्या ट्रफिकच्या नावाने ओरडायचो पण वाईट ट्रफिक काय असते ते इथे आल्यावर पाहिलं. म्हणजे बाईकवाला volvo सारखी बाईक चालवतो तर volvo वाला बाईक सारखी volvo  चालवतो!!!निसर्गरम्य ठिकाणे नाहीत ते जाऊ द्या पण निसर्गाबद्दलची एक आवड असावी, तर ती ही नाही. सगळे उदासीन. कोणे एके काळी हैदराबाद विशाल शिळा असलेल्या टेकड्यांनी वेढलं होतं, त्याची जागा आता सिमेंटच्या इमारतींनी घेतलीय. त्यात तरी सौंदर्यदृष्टी असावी तर ते ही नाही. जिथे जागा मिळेल तिथे हवी तशी बांधकामं होतायत. निझामाची सौंदर्यदृष्टी शहरात नाहीच.... एक के बी आर पार्क म्हणून छोटासा जंगलाचा तुकडा शहरात अंग चोरून उभा आहे.
बंगळूर हिरवं आहे. एक आजूबाजूचा निसर्ग जपण्याची इच्छा तरी लोकांमध्ये दिसते. बोलण्यात, वागण्यात आणि भाषेत गोडवा आहे.    
इथलं सरकार तरी काय करतं माहित नाही. ते कायम तेलंगणच्या कात्रीत सापडलेलं. बाकीचं राजकारण जाउद्या पण इतर उपक्रम, पर्यटन, कला या गोष्टींचंही  सरकारला वावडं असावं.  लोकही कलेच्या बाबतीत निरस. चित्रमयी म्हणून असलेल्या सरकारी आर्ट गॅलरीची अवस्था बिकट आहे. (बंगाळूरातली कर्नाटक चित्रकला परिषद आठवते. ती सोन्याचे दिवस पाहतेय!!!). जुन्या काळच्या कथांमध्ये, इतिहासात आपण वाचतो की एखाद्या राज्याचा सुवर्णकाळ म्हणजे कला संस्कृती आणि व्यापार भरभराटीला आलेले असतात. तसं आत्ता बंगळूर भरभराटीला आलंय.
त्या दृष्टीने आता हैदराबादचे दिवस भारत आलेत... कारण कला आणि संस्कृतीच्या नावाने बोंबच, पण सांस्कृतिक वारसाही टिकवता येत नाहीय या सरकारला. तेलंगणाच्या नावाखाली माथेफिरूंनी आंध्रच्या कवी आणि लेखकांचे पुतळे फोडले पण सरकार हतबल......तेलंगणाची मागणी काय आणि कशी हा वेगळा विषय पण त्या नावाखाली शिक्षणाचे जे काही धिंडवडे चाललेत ते पाहवत नाही. जी टगेगिरी चाललीये त्या बद्दल सरकार काहीच नाही करू शकत.
बंगळुरात किंवा कर्नाटकात कुठेही जा, रस्त्यांवर व्यवस्थित पाट्या आणि पर्यटन स्थळांच्या वेगळ्या पिवळ्या पाट्याही! इथे कुठे पाट्याही पाहायला नाही मिळत.
अशी लिस्ट काढली तर संपणारच नाही... काहीतरी चांगलं असेल इथे असं स्वतःला पटवण्याचा प्रयत्न करतोय....शोधतोय .....

   

२ टिप्पण्या:

  1. अगदी मनातले ! ओळ-ना-ओळ पटली मला ..
    बंगळुरात मी कुठेही रस्ता ना चुकता भटकू शकतो, पण तेच हैदराबादेत कठीण आहे. व्यवस्थित दिशादर्शक तर मला सापडलेच नाहीत कुठे.बंगळूरला ट्राफिक भारी आहे, पण नियम तरी पाळले जातात.बंगळूरचे वातावरण मला खूप आवडते, अगदी आल्हाददायक.आणि गजरा लावलेल्या मुली...हाहाहा !! पण डोसा हा हैदराबादेत मिळाला मला, बरेच टिफिन सेंटर आहेत की !(अर्थात मला अमीरपेठेत सापडले होते बरेच.)हैदराबाद म्हटले की डोसा-इडली पेक्षा बेकरी प्रोडक्ट्स जास्त सहज मिळतात.
    बंगळूर तुलनेत बरेच योजनाबद्ध शहर आहे. शहर म्हणून मला बंगळूर हैदराबाद्पेक्षा जास्त आवडले.

    उत्तर द्याहटवा
  2. मांसाहारी असाल तर चारमिनारजवळ ’शादाब’ नावाचं अप्रतिम हॉटेल आहे.बिर्याणीसाठी.तळमजल्यावर बांद्रा किंवा मो.अली रोडसारखं टिपीकल वाटेल पण वरचा मजला थ्री स्टार आहे.सर्विसही उत्तम आहे.

    उत्तर द्याहटवा

Rishibhai मित्रांनी दिलेलं नाव.