शनिवार, १ जानेवारी, २०११

मालिका....



डोकं ठणकायला लागलंय. तोडफोड, आदळआपट करावीशी वाटतेय. आणि असंही वाटतंय, हे सगळं लोक सहन तरी कसं करू शकतात?
मी टी. व्ही. वरल्या मालिकांबद्दल बोलतोय. म्हणजे मनोरंजन वगैरे तर सोडाच, सहन करणंही कठीण अशी परिस्थिती. पूर्वी मालिका म्हणजे १३ भागांची. आठवड्यातून एक भाग. त्या मालिकेत आवश्यक असणारी गोष्ट म्हणजे एक कथा असायची......         

आपला दर्जा घसरत चाललाय का? नैतिक, सामाजिक, वैचारिक.... कुठे चाललो आहोत आपण?   

आपल्या किंवा कुठल्याही संस्कृतीत मनोरंजनाचा उगम कसा झाला? दिवसभर कष्ट करून थकल्या भागल्या जीवांना संध्याकाळी थोडा मानसिक विसावा मिळावा या कल्पनेतून. अगदी आदिम काळात नृत्य, गायन आणि वादन अशी सामुहिक मनोरंजनाची साधनं होती. या साधनांनी कलेचं रूप घेतलं...कला बहरली. या कलांमध्ये मग अभिनयही आला. या कला आणि संस्कृती हातात हात घालून बहरली. 

आपल्याला आपल्या संस्कृतीचा अभिमान आहे, कारण ती जगात सर्वात प्रगत संस्कृतींपैकी एक आहे. या संस्कृती प्रमाणेच आपल्या कला देखील अतिशय प्रगत दर्जाच्या आहेत.    

आपल्याला या गोष्टीचा विसर पडलाय का?

आता टी. व्ही. च्या अनेक चॅनेलवर प्रसारित होणा-या मालिकांबद्दल बोलू. अनेक प्रश्न पडतात......
१. यात अभिनय किती उरलाय? 
२. कुठल्या समाज आणि संस्कृतीचं या प्रतिनिधित्व करतायत?
३. अनेक धोकादायक बाबी अगदी सहज पचवल्या जातात, आपल्या अंगवळणी पडतात.....
या मालिकांमधून किती अंधश्रद्धा पसरवल्या जातायत 
इतिहासाचा विपर्यास केला जातोय
कौटुंबिक आणि सामाजिक मूल्यांना तडीपार केलं जातंय 
कला आणि संस्कृतीचे धिंडवडे निघतायत 
नैतिक आणि वैचारिक मूल्यांना तडा जातोय 
सगळ्यात धोकादायक म्हणजे नवीन पिढीच्या जडण-घडणीवर आघात होतोय.
तरुण पिढी याच्या आहारी नाही जात पण आजी आजोबांची पिढी आणि नातवंडांची पिढी यांना मात्र या मालिकांनी वेढलंय.
या सगळ्याचा आपण किती विचार करतोय?         

मयतालाही फॅशन जपणा-या या मालिकांमध्ये रोज कुणीतरी कुणाविरुद्ध तरी कट करत असतं, कारस्थान रचत असतं. एखाद्या 'गोजिरवाण्या' घरावर कायम संकटच येत राहतात (मला आजपर्यंत कळलं नाहीय, की या गोजिरवाण्या घरात 'गोजिरवाणं' काय आहे).   येवढी खलनायक प्रवृत्ती आहे आपल्यात? ख-या आयुष्यात आपण असेच वागतो ? नाही. पण धोका पुढे आहे. या मालिकांमधून ज्या गोष्टींचा आपल्यावर  सतत भडीमार होतो, त्या आपल्याला कालांतराने ख-या वाटायला लागतात. 

माझ्या आजीला मी पाहतो. ती मालिकेतल्या एखाद्या पात्राचा छळ पाहून डोळ्यात पाणी आणते...... छोट्या मुलांना वाटतं, शक्तिमान त्यांना वाचवायला येईल..... भीम, गणपती, हनुमान या व्यक्तीचं आपण कोणतं रूप मुलांसमोर ठेवतोय ? का नाही युगंधर सारखी पुस्तकं किशोरवयीन मुलांसमोर येत? का नाही त्यांच्या विचारांना चालना मिळत ? कुणीतरी कुणाचा तरी इन्साफ पाहून आत्महत्या करतो. हा कुणाचा तरी इन्साफ पाहण्यापेक्षा आपण रामशास्त्री का नाही पाहत? 

खरा उद्देश मनोरंजनाचा पण आपण तोच विसरलोय...शहरापासून ग्रामीण भागापर्यंत लोक आपापली कामं सोडून या मालिकांमध्ये गुंतून पडतायत. याचा परिणाम म्हणजे कौटुंबिक आणि सामाजिक मुल्यांचा -हास होतोय.  आपण आपली सद्सद्विवेक बुद्धी गहाण टाकलीय का ? या मालिका आपला सांस्कृतिक दर्जा उंचावतायत की खालावतायत?

मालगुडी डेज, 
मिट्टी के रंग 
नीम का पेड 
वागले की दुनिया 
मुंगेरीलाल के हसीन सपने 

अशी खूप मोठी यादी होईल. काय दर्जा होता त्यांचा .....


एक लक्षात ठेवायला हवं. मागणी तसा पुरवठा. आपण अशा कार्यक्रमांची टीआरपी खाली आणायला हवी. त्यासाठी आपणच कार्यशील व्हायला हवं, आपल्या आप्तेष्टांना पटवून द्यायला हवं....
जर प्रत्येकानं मालिकांमध्ये वाया जाणा-या वेळापैकी १ तास देशाला सोडाच पण आपल्या कुटुंबाला दिला तर? खूप फायदा होईल हो याचा! घरात मुलांबरोबर पत्ते खेळा, कॅरम खेळा, आईवडिलांबरोबर सध्याच्या विषयावर चर्चा करा, जरा सांस्कृतिक कार्यक्रमांना गर्दी करा....
एखादं चित्रकलेचं प्रदर्शन पहा. समजत नसेल तर समजून घ्यायचा प्रयत्न करा. तीच गत शास्त्रीय संगीताची अन गायनाची. आपण ते कधी समजून घ्यायचा प्रयत्न केलाय की फक्त रडगाणं म्हणून हिणवलय?

मालिकांच्या विश्वातून बाहेर येऊन या कलांच्या भावविश्वात जरा रमून पहा. खूप सुंदर विश्व आहे हे. हे आपण दुसऱ्यांनाही पटवून द्यायला हवंय....

२ टिप्पण्या:

  1. खरंच!
    अगदी माझ्या मनातले विचार आहेत. आणि खरोखरच खालावत चालला आहे दर्जा सुद्धा आणि आपल्या चांगुलपणाच्या अपेक्षाही.
    आपल्या स्वतःच्या मुलांनी असं आयुष्य जगावं का? याचा आपण विचार करावा. मुलांना तसं सांगावं... नाहीतर ते खरोखरच वाहवत जातील.

    उत्तर द्याहटवा

Rishibhai मित्रांनी दिलेलं नाव.